राजकीय कार्यकर्त्यांच्या त्रासापासून वाचवा; पालिकेचे पोलिसांना पत्र   

पुणे: राजकीय पक्षांचे पदाधिकारी, संघटना यांच्या प्रतिनिधींकडून महानगरपालिका प्रशासनावर दबाव टाकून बदल्या, कर्मचार्‍यांवर कारवाई करा, चौकशी लावा, कंत्राटी पध्दतीने कामगारांना कामावर घेण्याच्या मागणीसाठी घोळक्याने कार्यकर्ते येत असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी हैराण झाले आहेत. यामुळे सुरक्षा विभागाने एका राजकीय पक्षाचा पदाधिकार्‍यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. हा पदाधिकारी घोळक्याने कार्यकर्त्यांना घेवून येत असल्यामुळे  कार्यालयांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे, असे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
 
महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागात विविध कामासाठी नागरिक येतात. काही वेळा अधिकारी भेटत नसल्यामुळे निघून जातात. मात्र, महानगरपालिका प्रशासनातील अधिकार्‍यांवर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या त्रासाला कंटाळून कार्यालय सोडून जाण्याची वेळ सध्या येत आहे. काही अधिकार्‍यांनी तर राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. विविध संघटनांच्या आडून गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींकडून केल्या जाणार्‍या आंदोलनांमुळे महापालिकेचा सुरक्षा विभागच स्वत: असुरक्षित समजु लागला आहे. असे आंदोलन करण्यापुर्वी पोलिस परवानगी न घेणार्‍यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी करणारे पत्रच सुरक्षा विभागाने पोलिसांना पाठविले आहे.
 
महानगरपालिकेत किंवा प्रवेशद्वारासमोर नागरिक, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, कामगार संघटनांकडून आंदोलन केले जात असते. याप्रकारचे आंदोलन करण्यापूर्वी पोलिस परवानगी घेणे आवश्यक असते. तसेच या आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ हे संबंधित खातेप्रमुख आदी अधिकार्‍यांना भेटण्यासाठी येते. या शिष्टमंडळात कोणाचा सहभाग आहे, याप्रकारची कल्पना महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर बंदोबस्तास असलेले पोलिस, महापालिकेच्या सुरक्षा रक्षक विभागाला देणे आवश्यक आहे. या शिष्टमंडळाची भेट संबंधित अधिकार्‍यांशी झाल्यानंतर त्यांना पुन्हा महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर पाठविण्यापर्यंत सुरक्षा विभागाचे कर्मचारी तैनात असतात. 
 
काही संघटनांकडून कोणतीही पूर्व सूचना न देता महापालिकेत आंदोलन करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे महापालिकेच्या सुरक्षा विभागालाच असुरक्षित वाटू लागले आहे. त्यामुळे सुरक्षा विभागाने पोलिसांना पत्र पाठविले आहे. संघटनांच्या आडून काही गुंड प्रवृत्तीचे लोक या आंदोलनात सहभागी होत असल्याचे आढळून आले आहे. मोठा जमाव घेऊन अचानक हे आंदोलनकर्ते मोठ मोठ्याने घोषणाबाजी करतात, इमारतीमध्ये बैठक मांडून आंदोलन करून रस्ता अडवून बसतात, काही आंदोलनात महापालिकेच्या कंत्राटी कामगारांचाही सहभाग असल्याचे आढळून आल्याचे सुरक्षा विभागाच्या पत्रात नमूद केले आहे. आंदोलनकर्त्यांना घोषणाबाजी करू नका, प्रशासकीय कामात अडथळा आणू नका अशा सुचना करूनही त्यांच्याकडून पालन केले जात नाही. महापालिकेच्या सुरक्षा विभागाकडून आंंदोलनाचे चित्रीकरण केले जात असते, त्या कर्मचार्‍यांनाही आंदोलनकर्त्यांकडून विरोध केला जातो. तसेच आंदोलनकर्ते कोणतीही परवानगी न घेता मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत असतात. अशा प्रकारांविषयी महानगरपालिकेकडून पोलिसांकडे तक्रार दाखल केली जात असते. या प्रकारचे आंदोलन करणार्‍यांना महापालिकेत येण्यापूर्वी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणि सुरक्षा विभागाकडे पत्र देणे आवश्यक आहे. या नियमाचे पालन न करता आंदोलन करणार्‍यांना समज द्यावी अशी मागणी सुरक्षा विभागाने केली आहे.
 

Related Articles